![](https://informationessay.com/wp-content/uploads/2024/03/प्लास्टिक-प्रदूषण-1024x538.png)
सध्याच्या आधुनिक जगात प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. आपण पूर्वी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायचो. पण आता प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पितो. पूर्वी लोक जिथे कुठे बाहेरगावी जायचे त्या गावातील पाणी प्यायचे. पण आता आपण सगळ आरोग्यदायी पाहिजे, म्हणून तिकडचे स्थानिक पाणी न पिता, नवीन बाटली विकत घेतो आणि पाणी पितो. त्यामुळे आपण एका दिवसाला कितीतरी नवीन बाटल्या विकत घेतो. पण आपल्याला हे कळत नाही, की या बाटल्यामुळे खूप प्रदूषण निर्माण होते.
आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टींमुळे प्लास्टिकचा वापर नकळत किंवा स्वतःहून करत असतो. त्यामुळे आपण निसर्गाचा किती मोठ्या प्रमाणावर ऱ्हास करतो, याची आपल्याला कल्पना येत नाही. परंतु ज्यावेळी प्लास्टिक मोठ्या प्रमाणात जाळले जाते, त्यावेळी होणारे प्रदूषण आणि त्यातून निर्माण होणारे आजार, हे आपल्याला आयुष्यभराचे दुखणे होऊन बसते.
आपण दैनंदिन जीवनात छोट्या-छोट्या गोष्टीतून प्लास्टिक कसे वापरतो, ते पाहूया.
कचऱ्याचा डबा घाण होऊ नये, म्हणून आपण रोज एक ‘डस्टबिन बॅग’ कचऱ्याच्या डब्याला लावतो. ती पिशवी जरी पातळ असली, तरी सुद्धा ती जाळल्याशिवाय तिचा निचरा होत नाही. त्यामुळे आपण कितीतरी हजार पिशव्या वापरतो आणि जाळतो.
आजकाल सगळ्यात मोठा मुद्दा हा लोकसंख्येमुळे निर्माण झाला आहे. लोकसंख्या वाढली, की कचऱ्याचे प्रमाण तेवढे वाढते. प्रत्येक माणसामागे जवळजवळ एक टन कचरा तर महिन्याला साचतो. हे तर डोळ्याना दिसणारे प्लास्टिक आहे.
परंतु रोजच्या जीवनात आपण डोळ्याना न दिसणाऱ्या, पण प्लास्टिक असणाऱ्या अशा अनेक गोष्टींचा सतत वापर करत असतो. म्हणजे आपली घरातील ट्यूब किंवा कपडे धुण्याचा सोडा त्यामध्ये देखील प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अगदी प्लास्टिक सिलेंडर मध्ये सुद्धा. काही ‘पॉलिथिन’ प्रकारचे कपडे, यात देखील प्लास्टिकचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.
आपण सतत प्लास्टिक वापरले, तर त्याचा पर्यावरणावरती खूप मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होतो. तर ते दुष्परिणाम काय आहेत, ते बघूया.
प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर ज्या मैदानात साचते, त्याच्या आजूबाजूला खूप घाण वास येतो. त्या वासामुळे डासांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यात तो सगळा कचरा जर एकाच वेळी जाळला, तर खूप मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण निर्माण होते.
कधी-कधी गावांमध्ये आपण प्लास्टिकच्या पिशव्या नदीत टाकतो. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये समुद्रात प्लास्टिक पिशव्या टाकल्या जातात. समुद्रकिनारी देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांचे प्रमाण आढळते. या सगळ्याचा निचरा मानवनिर्मित असल्यामुळे तो माणसांनीच करणे गरजेचे आहे.
परंतु सरकारच्या आणि आपल्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे आपण अनेकदा प्लास्टिकच्या कचऱ्याला दुर्लक्षित करतो. जेणेकरून त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण हे हवा आणि पाण्यात दिसून येते.
आपण रोज कळत नकळतपणे निसर्गावर खूप मोठ्या प्रमाणावर अत्याचार करत असतो.
प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे मातीचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. आपण वेळीच कचऱ्याचा नीट निचरा न केल्याने मातीची गुणवत्ता खालावते. त्यातूनच सुपीक जमीन नापिक जमीन व्हायला वेळ लागत नाही.
प्लास्टिक व्यतिरिक्तचा कचरा हा ‘बायोडिग्रेडेबल’ असतो. म्हणजेच काय तर बाकीच्या ओल्या कचऱ्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे खत निर्माण करू शकतो. पण प्लास्टिक हे बायोडिग्रेडेबल नसल्यामुळे ते पर्यावरणाला प्रदूषित करण्याचे काम करते . त्यामुळे त्याचा जितका कमीत कमी वापर करता येईल, तितका आपण करण्याचा प्रयत्न करूया.
सरकारने देखील प्लास्टिक पिशव्यांवर अनेक प्रकारची बंधने घातली आहेत. जर कोणताही भाजीवाला किंवा कोणताही विक्रेता प्लास्टिकची पिशवी देत असेल, तर त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जातो.
आपण प्लास्टिकचा वापर न करता त्याला पर्याय म्हणून अनेक गोष्टींचा वापर करायला सुरुवात देखील केलेली आहे.
आपण प्लास्टिकचा प्रदूषण कसे रोखू शकतो, हे पाहूया.
1. स्टीलच्या बाटल्या वापरणे-सध्याच्या काळात जनजागृतीमुळे बऱ्याच लोकांनी प्लास्टिकच्या बाटलीला पर्याय म्हणून स्टीलच्या बाटल्या वापरायला सुरुवात केली आहे. प्लास्टिकच्या बाटल्यामुळे होणारे रोजचे प्रदूषण थांबवण्यासाठी आपण जिकडे-तिकडे स्वतःची स्टीलची बाटली घेऊन जाऊ शकतो. हा प्लास्टिकच्या बाटलीला एक उत्तम पर्याय असल्याकारणाने लोकांनी ते मोठ्या प्रमाणावर वापरायला सुरुवात देखील केलेली आहे.
2. प्रवासाला जाताना आपले पाणी आपण सोबत न्यावे. ज्या गावी आपण जात असू, तिकडचे पाणी प्यावे. हा देखील पर्याय लोकांनी सुरू केला आहे. प्रत्येक स्टेशन वरती आजकाल खूप कमी दरात पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करणे आपण कमी करू शकतो.
3. पूर्वीच्या काळी तेलाचे कॅन आणि तेलाच्या पिशव्यांमुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या वापर व्हायचा. परंतु आता लोक तेलाच्या पिशव्या या वेगळ्या पद्धतीने बनवतात. त्यामुळे प्रदूषण कमी होते.
4. पूर्वी सगळ्या मोठमोठ्या कंपन्या प्लास्टिकचे कप आणि स्ट्रॉ सर्रास वापरायच्या. परंतु आता जनजागृतीमुळे आणि सरकारच्या बंधनामुळे मोठमोठे ब्रँड सुद्धा पेपरचे कप आणि पेपरच्या स्ट्रॉ वापरतात.
5. आजकाल लोक बाहेर कॉफी प्यायला गेले, तरी स्वतःचा कप आपल्याबरोबर घेऊन जातात. जेणेकरून प्लास्टिकच्या कप मध्ये कॉफी वापरणे किंवा घेणे बंद होईल.
6. सध्याच्या काळात भाजीवाले, फळ विक्रेते आणि छोटे दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्या देणे बंद करत आहेत. कारण सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर मोठ्या प्रमाणावर दंड आकारला सुरुवात केली आहे. त्यामुळे बऱ्याचशा बायका आणि जागृत झालेले लोक स्वतःची पिशवी आपल्याबरोबर नेतात. कापडी पिशवी किंवा त्यांना पर्याय म्हणून आजकाल नवीन आलेल्या “टोड बॅग्स” चा वापर करायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे.
7. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरकार आणि अनेक सामाजिक संस्था प्लास्टिक विरोधात विविध जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे. त्यातून लहान मुलांना प्लास्टिक मुळे प्रदूषण होते. पर्यावरणाला ती गोष्ट चांगली नाहीये, याची जाणीव झालेली दिसते. त्यामुळे बदलाची सुरुवात झाली आहे.
प्लास्टिक मुळे होणारा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे गुरांना होणार त्रास. ज्यावेळी आपण कचरा टाकतो, त्यावेळेला प्लास्टिक युक्त कचरा रस्त्यावर पडतो. कुत्रा, मांजर, गाय, म्हशी यांसारखे प्राणी ते प्लास्टिक खातात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. सगळ्यात मोठा परिणाम तर गाईंवरती दिसतो. प्लॅस्टिक मुळे त्यांना पोटाचे विकार, कॅन्सर सारखे आजार, गरोदर गाईचे वासरू जन्मालाच न येणे, यांसारखे परिणाम दिसून येतात. कारण प्लास्टिक त्यांच्या पोटात जाऊन त्यांच्या शरीरावर ते घातक परिणाम करतात. म्हणूनच हे सगळं रोखण्यासाठी आपण दैनंदिन जीवनात जितका कमी प्लास्टिकचा वापर करता येईल तितका कमी वापर करूया.