माझे आवडते प्रेक्षणीय स्थळ
माझे बाबा आणि मला फिरायला खूप आवडते. आम्ही दरवर्षी देशातील एक तरी ठिकाण ठरवतो आणि तिथे फिरायला जातो. आज पर्यंत मी जवळजवळ सहा राज्यांमध्ये फिरलो आहे, अनेक ठिकाणी पालथी घातली आहेत परंतु त्यातले सगळ्यात आवडीचे ठिकाण म्हणजे ‘बदामी आणि हम्पी!’. कर्नाटकात स्थित असलेले हे बदामी. याला बदामी दगडांचा देश देखील म्हणतात! आणि बदामीचे दुसरे नाव ‘वातापी’ असे देखील आहे. बागलकोट जिल्ह्यातील अगस्त तलावापाशी वसलेले हे बदामी शहर अत्यंत सुंदर आहे. याला बदामी हे नाव त्याच्या बदामी खडकांमुळे पडले. ज्या वेळी कोणत्याही आधुनिक सुविधा नव्हत्या त्या वेळेला दगडात कोरलेल्या गुफा, वेगवेगळे मंदिरे हे बदामीचे वैशिष्ट्य आहे.
मुळातच बदामी हे खूप सुंदर शहर आहे, या शहराला एक मोठा वारसा लाभला आहे तो म्हणजे ती चालुक्य राजवटीची राजधानी होती. इसवी सन पाचवे ते सातवे शतक या कालावधीत त्यांनी राज्य केले. पुरातत्व विभागात याचे शिलालेख आहेत. येथील प्रत्येक शिलालेख इतिहासाच्या गोष्टी आपल्याला अगदी सहजपणे सांगतात. येथील शिलालेखांवर प्राचीन कानडी भाषेत सगळी माहिती कोरलेली आहे. तसेच या ज्या गुहा बदामी शहरात आहेत, त्या अत्यंत प्राचीन मानल्या जातात कारण सहाव्या शतकात त्या कोरलेल्या आहेत. तसेच बदामी शहरातील या खडकांचे वय काढले असता ते साधारण अडीच हजार ते 3000 वर्षे जुने आहे! त्याकाळी कोणतीही उपकरणे नसताना एवढ्या अवाढव्य गुफा आणि त्यावर कोरलेली शिल्पे हे कोणत्याही माणसाला अवाक करणारी आहेत. तेथील मुर्त्या या फार वेगळ्या आहेत. प्रत्येक मूर्ती वर एक कथा लिहिलेली आहे त्या मुर्त्यांमध्ये रामायण आणि महाभारताचे देखील संदर्भ आपल्याला मिळतात.
या बदामी शहरात अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत, जसे की बदामी लेणी हे सगळ्यात मुख्य आकर्षण आहे. तेथील किल्ला, अगस्त्य तलाव, विविध मंदिरे जी जगभर प्रसिद्ध आहेत. येथील लेणी मंदिरे खूप प्रसिद्ध आहेत. ही सगळ्यात मोठ्या दगडाला कोरत अशी बनवली आहेत आणि या मंदिराच्या प्रत्येकाच्या एक गुफा आहेत. पूर्ण बदामी लेण्यांमध्ये एकूण चार गुफा आहेत. त्यातील एका गुफेतील ‘नटराजाची मूर्ती’ खूप प्रसिद्ध आहेत. येथे गणपती, विष्णू व कार्तिक यांच्या देखील मूर्ती खूप छान कोरलेल्या आहेत आणि अर्धनारीनटेश्वर याची मूर्ती तर खूपच प्रसिद्ध आहे. भिंतीवर केलेले हे कोरीव काम खूप बारकाईने केलेले आहे. यात प्रत्येक गोष्टीचे संदर्भ आपल्याला मिळतात अगदी त्याकाळी काय राजकीय परिस्थिती होती? तिथपासून ते कोणते दागिने त्यांनी अंगावर घातले होते? इथपर्यंत अंतर्भूत माहिती आपल्याला मिळते.
या बदामीत एकूण ज्या चार गुफा आहेत. त्यातील पहिली गुफा ही शंकराला समर्पित केलेली आहे. दुसरी विष्णूला समर्पित केली आहे. तिसरी देखील विष्णू आणि विष्णूचे दास यांना समर्पित केली आहे आणि चौथी गुफा जैन धर्मातील तीर्थकारच्या अनुयायांना समर्पित केली आहे. या चारही गुफांमध्ये मूर्ती इतिहासाचे अनेक धडे गिरवले आहेत. या गुफांमध्ये शंकर विष्णू यांच्या विविध प्रकारच्या मुर्त्या आहेत. काही शिल्पांवर, तर भारतातील सर्व वाद्यांची अगदी तपशीलवार माहिती दिलेली आहे आणि प्रत्येक वादकाने एक वाद्य पकडले आहे. अशा अनेक वाद्यांची माहिती तिथल्या शिल्पांवर आपल्याला मिळते. यातून इतिहासाचा असा उलगडा होतो की भारतात पूर्वीच्या काळी कोणकोणत्या वाद्यांचा वापर संगीतासाठी केला जायचा.
पहिली गुफा जी शंकराला समर्पित केली आहे, त्यात शंकर पार्वती गणपती कार्तिकीय अशा सगळ्यांच्या मुर्त्या आपल्याला बघायला मिळतात. जी गुफा विष्णू ला समर्पित केली आहे त्यात आपल्याला विष्णू देवाचे अनेक अवतार बघायला मिळतात तसेच देवीचे देखील अनेक अवतार बघायला मिळतात.
यातील जैन धर्माची जी गुफा आहे, ती त्यांचे सगळे तीर्थंकर अनुयायी दाखवते. यात २३ तीर्थंकर पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे. २४ तीर्थंकर महावीर यांच्या देखील मूर्ती आहे. गुफा पाहून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रसिद्ध असावे जे ‘भूतनाथ मंदिर’. या मंदिराच्या आजूबाजूला अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. त्या प्रत्येक मंदिरावर वेगवेगळ्या कोरीव कामातून इतिहास सांगितलेला आहे. त्यानंतर अजून एक ठिकाणचे प्रसिद्ध आहे, ते म्हणजे ‘अगस्त तलाव’. हा तलाव मानव निर्मित आहे. त्याच्या आजूबाजूला डोगर आहे.
बदामीचे वैशिष्ट्य म्हणजे हे शहर सहाव्या शतकातील चालुक्य राज्याची राजधानी आहे आणि अनेक छोट्या मंदिराचा समूह म्हणुन या शहराला ओळखले जाते. मुळातच चालुक्य राज्यात याच शहरात मंदिरे यासाठी बांधली गेली होती कारण याच्या आजूबाजूला डोंगर असल्याकारणाने असलेली मंदिरे ही सुरक्षित राहतील. म्हणून त्या काळच्या राजाने येथे सगळ्यात जास्त मंदिरांची स्थापना केली.
या शहरात जितके शिलालेख कोरलेले आहेत, त्याची भाषा ही जूनी कन्नड लिपी आहे. सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक शिलालेख हा इतिहासातील कोणत्या ना कोणता प्रसंग शिकवून जातो.
बदामी किल्ल्यात एकूण दोन शिवालये आहेत. एक अप्पर शिवालय आणि दुसरे लोअर शिवालय.
बदामी हे शहर टिपू सुलतान च्या काळात खूप प्रसिद्ध झाले, म्हणूनच बदामीला खूप मुघल सैनिकांनी आणि बाकी परकीय आक्रमणात सतत त्रास दिला परंतु एवढी आक्रमणे होऊन सुद्धा बदामी हे शहर अगदी तोऱ्यात उभे आहेत! एकूणच काय तर बदामी शहरातील मंदिरे, त्यावर कोरलेले नक्षीकाम, प्रत्येक शिलालेख ,अगस्त्य तलाव, किल्ला या सगळ्याची मेजवानी आहे.
हे शहर इतके सुंदर आहे की भारत सरकारने देखील या शहराला जागतिक वारसा म्हणून घोषित केलेले आहे. तसेच येथे असलेला पुरातत्व विभाग म्हणजे इतिहासकारांना एक पर्वणीच आहे. इथे एक वस्तुसंग्रहालय पण आहे. म्हणूनच भारतात इतक्या ठिकाणी फिरून सुद्धा मला कर्नाटकातील हे बदामी शहर खूप आवडते हे शहर माझ्यासाठी सगळ्यात आवडते प्रेक्षणीय स्थळ आहे.